प्रत्येकाने आपल्यासाठी एक अशी हक्काची जागा राखून ठेवलेली असते की जिथे गेल्यावर तो स्वतःशी संवाद साधतो. तो जेव्हा निराश होतो, दु:खी होतो किंवा त्याला काही विचार करायचा असतो तेव्हा तो त्या आवडत्या कट्ट्यावर जाऊन बसतो. आता माझ्यासाठी असं ठिकाण म्हणजे आमच्या घराची गच्ची. आसपासची अनोळखी गर्दी, आपली माणसे, आपण जमा केलेल्या वस्तू, या सार्यांनी आपलं सभोवताल अशा विचित्र पद्धतीने गुरफटलेलं असतं की आपल्याला आपण दिसतच नाही. मग कुठून साधणार संवाद? कधीकधी हे सारं अनावर होतं आणि आपण आपोआपच जाऊन पोहोचतो त्या आपल्या कट्ट्यावर. स्वत:शी मनमुराद गप्पा मारायला.
मग सुरुवात होते ती स्वतःच्या ओळखीपासून, जसं काही आपण स्वत:ला ओळखतच नाही. आपला आपल्याच मनात असलेला एक चेहरा समोर येतो. जशी-जशी ओळख पूर्ण होत जाते तसा-तसा चेहरा पूर्ण होत जातो. मग कळतं अरे इतके दिवस समाजात वावरणारा ‘मी’ असा दिसतो? आपल्याला आधीच वेगवेगळ्या नात्यांनी वेगवेगळी ओळख दिलेली असते. आईसाठी आपण एक छोटसं बाळ असतो जे कितीही मोठं झालं तरी तिला वाटत असतं कि तिच्याविना पुढच्याच क्षणी ते धरपडणार आहे, बाबांसाठी आपण एक कच्च मडकं असतो जे अजून जीवनाच्या विविध धक्यांनी पक्क झालेलं नाहीये, दादासाठी आपण अगदीच मुर्ख बालक असतो ज्याला कुणीही वेडं बनवून जाईल, इ. पण आपल्या कट्ट्यावर आल्यावर हे सगळे बाह्य मुखवटे गळून पडतात आणि आपल्याला ‘आपण’ दिसतो.
मी माझ्या कट्ट्यावर आल्यावर वेगवेगळ्या विषयांवर स्वतःशी गप्पा मारतो. आणि अत्यंत आश्चर्यकारक पद्धतीने मी स्वतःशी प्रत्येक बाबतीत सहमत होतो. मित्रांशी गप्पा हाकताना मात्र हा प्रकार वेगळा असतो. तिथे जवळपास सगळेच माझ्या विचारांशी असहमत असतात किंवा मी त्यांच्या विचारांशी. म्हणूनच कि काय मी मित्रांपेक्षा माझ्या ह्या कट्ट्यावर जास्त रमतो. इथे मला उगाच कसला आव आणायची गरज नसते. इथे ‘मी’ अत्यंत नितळ स्वरूपातला ‘मी’ असतो.
कधीकधी ह्या कट्ट्यावर गेल्या आयूष्याचा मागोवाही घेतला जातो. किती माणसे आपल्याला भेटली? किती सोडून गेलीत आणि कितीतरी अजूनही काही घट्ट अनुबंधांनी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. कुणाला आपण दुखावले, कुणी आपल्याला दुखावले, सगळं सगळं बाहेर येतं. आपण केलेल्या चूका आपल्याला कळतात. आपण मिळवलेलं यश आठवतं आणि आपल्या पदरी पडलेलं अपयशही. मग या सगळ्या गोष्टींच पृथक्करण होऊन एक ‘अहवाल’ आपल्या समोर सादर होतो आणि तो म्हणजे ‘अनुभव’. मला नेहमी वाटतं आलय की आपण गेल्या आयुष्यात ज्या घटना जगलोय त्यांचा ‘अनुभव’ होण्याकरता आपला स्वतःशी संवाद होणं खुप आवश्यक असतं.
मला माझा कट्टा असं भरभरुन देतो आणि मी दोन्ही हात पसरुन ते घेत जातो. असा हा माझा गच्चीरुपी कट्टा माझा जिवलग आहे. पण आमच्या वाडीतल्या हिरवे काकांना त्यांचा कट्टा कोणता आहे असे विचारल्यावर ते म्हणतात, “पिंपळाचं झाड”. मस्त दाट सावलीत थंडगार हवेत ते ‘तिला’ घेऊन पिंपळाच्या झाडावर बसतात. आता येथे गैरसमज नको म्हणून सांगतो, ‘ति’ म्हणजे ५ रुपयात भरभरुन मिळणारी ‘गावठी’. जेव्हा-जेव्हा हिरवे काकाचं हिरवे काकूंशी भांडण होतं तेव्हा-तेव्हा ते त्या पिंपळाच्या झाडावर जाऊन बसतात. आणि यथेच्छ शिव्या हासडत ‘ति’चा लुफ्त उठवतात. संध्याकाळी जेव्हा ते घरी परतात तेव्हा ते पुन्हा रिचार्ज झालेले असतात, नव्या भांडणासाठी.
तुमच्याकडेही असा कट्टा असेल तर जरुर सांगा. तुमचाही कट्टा तुम्हाला रिचार्ज करतो का? कि तुम्ही वहावत जाता जुन्या आठवणींकडे? काय होतं तुमच्या कट्ट्यावर?
नक्की कळवा.
- मंगेश खैरनार
