रविवारची दुपार आणि पावसाची हजेरी, मन रमायला आणखी हवे तरी काय? पाऊस धोधो बरसत होता आणि मी खिडकीबाहेर हात काढुन मिळतील तेवढे थेंब स्पर्शत होतो. चला आता उकाडा संपणार, सगळीकडे हिरवाई नटणार, म्हणुन खुप आनंद होत होता.
मुंबईचा पाऊस असा खिडकीतुनच अनुभवायचा असतो, हे मला ठाऊक आहे. कारण भिजलोत तर उगाच सर्दि होईल आणि मग ऑफिसला गेल्यावर ए.सी. मधे आणखी उरलेल्या आजारांना निमंत्रण, म्हणुन मी मुद्दाम बाहेर जाऊन भिजणे टाळत होतो. पण त्याचवेळी गावाकडचा पाऊस आठवला…..
गावांत असताना मी भिजण्यास भीत नसे. अहो पाऊस सुरु झाल्यावर उलट बाहेर हुंदडायला निघत असे. आणि गावच्या त्या पोषक वातावरणात सर्दि वगैरे काही होतच नसे. मग पाऊस ओसरल्यावर गावाबाहेरच्या डोंगराच्या पायथ्याशी जमुन आम्ही मित्र-मंडळी थंडी घालवण्यासाठी धुराचे लोट हवेत सोडायचो(वेगळे सांगणे नलगे).
पावसाची अशी खरी मादकता गावाकडेच पहायला मिळते. पावसाच्या नशेत सारी सृष्टी धुंद होऊन नाचत असते. झाडे अंग झटकुन नव्या हिरवाईचा कोट चढवून वार्यासोबत आनंदाचा नाच करत असतात, बेडके डरावच्या एका लयीने निसर्गगीताला संगीत देत असतात, सारेच प्राणी-पक्षी पावसाच्या सादेला प्रतिसाद देऊन मदमस्त होऊन आनंद लुटत असतात. अशावेळी गावाकडचा माणुसही मग सार्या चिंता, मळभ, दु:ख आणि जबाबदार्या थोडा वेळ बाजुला ठेवुन सृष्टीच्या या आनंदोत्सवात सहभागी होत असतो. या आनंदोत्सवातुन त्याला एक नवीन ऊर्जा मिळते, जगण्याची, आनंदाने जगण्याची. निसर्ग करत असलेल्या या प्रेमाच्या उधळणीत हवं तेवढं प्रेम उपभोगुन गावाकडचा माणुस नवीन जबाबदर्या घेण्यास तयार होतो.
पण मुंबईच्या माणसाला या सार्याची कदाचित माहितीही नसावी, तो फक्त त्याच्या जबाबदार्या आणि मिळकत यातच गुरफटलेला दिसतो. मग कधीतरी ह्या सार्याचा त्याला कंटाळा येतो, सर्व काही सहन करण्याच्या पलीकडे जाते आणि मग अशा वेळी त्याला निसर्गच आठवतो, मग तोही थोडा वेळ का असेना कुठेतरी निसर्गाच्या सानिध्यात दोन दिवस जाऊन येतो. एकुणच काय तर कळत-नकळत तोही ह्या सृष्टीच्या आनंदोत्सवात सामिल होतो.
मग मी तरी का म्हणुन ह्या सृष्टीच्या आनंदोत्सवापासुन दुर राहुन खिडकीतुनच पाऊस अनुभवावा, म्हणुन मीही घराबाहेर पडलो आणि यथेच्छ भिजण्याचा आनंद घेऊ लागलो. आणि पावसाने मला मोठ्या खुशीने सृष्टीच्या ह्या आनंदोत्सवात सामिल करुन घेतले…
Jun
5
2011